Tuesday, September 12, 2023

तृतीय पुण्यस्मरण

 ती. दादा,

आज तुम्हाला जाऊन ३ वर्षे झाली. जरी सगळे आता नेहेमीचे झाले असले, तरी तुमची आठवण सतत आमच्या सोबत असते. अजूनही कॉफी बनवण्यासाठी कप घेताना नकळत तुमचा पण कप घेतला जातो. सकाळी जिन्यावरून खाली येताना तुम्ही दिसत आहात का हा विचार डोकावून जातो.

जुलै मध्ये मी बरेच दिवस मी आजारी होतो. ताप. त्यामुळे तुमच्या खोलीत मुक्काम होता. फार फार आठवण येत होती. गादीवरून उठून बसताना, किंवा तिथेच बाजूला खुर्चीवर बसताना सतत वाटत होते कि  तुम्ही आजूबाजूला आहात, माझ्या हालचाली अगदी तुमच्यासारख्या होत आहेत. दोन-चार दिवसांनी अगदी रडवेला झालो होतो, इतके कि मी मेघनाला म्हणालो देखील कि या खोलीतले सगळे बदलून टाकू या.. तिने सावरून घेतले मला. तुमच्या आठवणी असणे चांगलेच आहे ना. कितीही दिवस झाले तरी त्या येताच राहणार आहे त्यातच आपल्या नात्याचे यश आहे. 

परवा माईकडे राखीपौर्णिमेच्या निमित्ताने जाणे झाले. जेवण झाले आणि माई सहजच म्हणाली - उठवत नाही आहे ... आणि तुमची आठवण झाली .. राम नगरकरांच्या "उठू कसा" या आठवणीवर तुम्ही एवढे हसला होतात, एवढे हसला होतात अजूनही लक्षात आहे.

यावर्षीचे गणपती व्हायचे आहेत अजून, पण आत्ताच आपले सगळे संवाद डोक्यातून जायला सुरुवात झाली आहे - "मोदकाचे वायन आणा", "गुरुजींना वायनाचे दान द्या" वगैरे. मागची दोन वर्षे खूप त्रास व्हायचा अशा आठवणी आल्या कि, आता काहीकाही वेळेला छान वाटते, तुम्ही नसलात तरी या आठवणी आहेत या जाणिवेने बरे वाटते. साऊथ इंडियन खाताना मी हटकून दहीवडा पण घेतो. तुमचा तो ठरलेला मेनू असायचा डोसा/उत्तप्पा काही असले तरी शेवट दहीवड्यानेच व्हायचा.

परवा जुने फोटो चाळताना तुमचा एक मस्त फोटो सापडला आहे, प्रसन्न हास्य!!


तुमच्या आठवणींसोबत तुमचा आशिर्वाद सतत आमच्या पाठीशी असू देत हीच ईच्छा !!

तुमचा,

मंदार 

Monday, September 12, 2022

द्वितीय पुण्यस्मरण

ती. दादा,

२ वर्षे झाली तुम्हाला जाऊन. आधी वाटले होते कि कसे करणार आम्ही तुमच्याशिवाय. पण कुठेतरी याची जाणीव पण होती कि तुम्ही आम्हाला खूप आत्मविश्वास पण दिला आहे. त्या बळावर चालू आहे आता. 

तुमची आठवण सगळीकडे भरून राहिली आहे. अजूनही जिन्यावरून उतरताना कधी कधी वाटते कि तुम्ही खोलीतून बाहेर येऊन "गुड मॉर्निंग" कराल. पण मग लगेचच जाणवते कि ते आता होणे नाही. काही आठवड्यापूर्वी मला कोरोना झाला त्यावेळेस तुमच्याच खोलीत वास्तव्य केले होते. अजूनही तुमच्या वास्तव्याच्या खाणाखुणा तिथे जागोजागी आहेत. तुमचा दाढीच्या सामानाचा डबा, तुमची पुस्तके तुमची आठवण करून देतात. छान वाटते. 

तुमच्या नसण्याला स्वीकारून आमच्या कामांमध्ये बदल करून वाटचाल सुरु आहे. गणपतीच्या वेळेस मागच्या वर्षीप्रमाणेच तुमची आठवण झाली. पण यावर्षी जरा तयारीत होतो. आरती करताना तुम्ही नसणार या जाणिवेने जरा जास्त काळजीपूर्वक आरत्या म्हणत होतो आणि सोबतीला पुस्तक पण घेतले होते मृण्मय आणि मेघनाने. "मोदकांचे वायन" आणि तुम्ही याची एवढी गट्टी आहे कि कितीही वर्षे झाली तरी आपले संवाद आठवत राहतील. 

बाप लेकाचं नातं तसं वेगळंच असतं. धाक आणि प्रेम याचे ते एक वर्णन न करता येणार मिश्रण असते. साधारणपणे महिन्याभरापूर्वी "एकदा काय झालं" नावाचा एक अप्रतिम चित्रपट बघितला. बाप-लेकाच्या नात्याचा तो एक सुंदर आविष्कार होता. कधीकधी मुलगा बापावर किती अवलंबून असतो आणि ते अवलंबित्व कितीही हवेहवेसे वाटले तरी त्याचा त्रास कसा होऊ शकतो त्याचे प्रत्यंतर त्या चित्रपटात आले.  प्रत्येक बापाला त्याचा मुलगा/मुलगी हि स्वतंत्र व्हावी अशी ईच्छा असते आणि तास त्याचा प्रयत्नही असतो. दुर्दैवाने चित्रपटातल्या बापाला ती संधी मिळतच नाही. 

पण तुम्ही आम्हा सर्वानांच स्वावलंबी बनवलेत - कधी प्रेमाने तर कधी धाकाने. आजही त्याची मधुर फळे आम्ही चाखतो आहोत. कॉलेजनंतर मी एकटाच बंगलोरला गेलो. परके शहर. कानडी भाषा. लोक हिंदी/इंग्लिश बोलतील कि नाही याची काही कल्पना नाही. जरी आधी कधीच एकटा राहिलो नसलो तरीही गेलो आणि छान जमले. आत्मविश्वासाने सगळ्या गोष्टी केल्या. याचे श्रेय आई आणि तुम्हालाच तर आहे.  

आणि आता मृण्मयला चार गोष्टी शिकवताना आपसूकच तुमची आठवण होत राहते. 


सुट्टीतले शुद्धलेखन आणि पाढे - हे म्हणजे तर कधीच न विसरता येणारी गोष्ट आहे. अगदी परवाच मृण्मयने अचानक विचारले - बाबा - ७८४ चे वर्गमूळ काय रे? क्षणाचाही विचार न करता तोंडातून उत्तर निघून गेले - २८. आणि तुम्ही डोळ्यासमोर चमकून गेलात.  

मधून मधून गीताई घराच्या चाफ्याच्या फुलांचे फोटो पाठवत असते आणि मी ते निमित्त काढून भूतकाळात जाऊन येतो. शेकड्याने काढलेली फुले. ती काढण्यासाठी बनवून घेतलेल्या त्या सळ्या - ३-४ वेगवेगळ्या लांबीच्या. मग ती दारावर उभे राहून विकलेली फुले. वरून खाली फुले सोडण्यासाठी केलेली ती दोरी आणि पिशवी.. 

अनंत आठवणी. पण आता त्या हव्याहव्याशा वाटतात. तुम्ही आजूबाजूला आहात असे वाटून छान वाटते. 

तुमची आठवण येत राहो आणि आम्हाला आधार मिळत राहो हेच देवाकडे मागणे!!

तुमचा,

मंदार 

Sunday, September 12, 2021

आठवणींची वर्षपूर्ती

ती. दादा,  

आज १२ सप्टेंबर २०२१. मनावर कायमचा कोरला गेलेला दिवस. याच दिवशी तुम्ही जगाचा आणि आम्हा सर्वांचा निरोप घेतला होता. 

त्या दिवसापासून एकही दिवस असा गेला नाही कि तुमची आठवण नाही आली. सकाळच्या कॉफीपासून रात्रीच्या "good night" पर्यंत. दिनचर्येचा प्रत्येक घटकेला काही ना काही मनाला स्पर्श करून जाते. कधी एखादी रम्य आठवण, कधी झालेले भांडण, कधी झालेला संवाद तर कधी जाहले वाद. सगळे खर्रकन डोळ्यासमोरून सरकते.

कॉफीसाठी कप्स घेताना, कॉफी मध्ये साखर घालताना हमखास तुमची आठवण होते दादा. जेवणाचे ताट लावताना तुमच्या त्या विशिष्ट वाट्या, ताटल्या. तुमच्या खोलीतून येणारा TV चा आवाज आणि तुमचे ते TV सिरीयल मधल्या पात्रांशी बोलणे. रोजच्या रोज देवांची पूजा, वेळच्या वेळी फेऱ्या मारायच्या. 

बाणेर च्या घरी आल्यापासून तुम्ही नेहेमी घरीच असायचात आणि त्यामुळे बाहेर पडताना तुम्हाला सांगून जायचो आम्ही सगळे. पण आता घराला कुलूप लावावे लागते. "आम्ही जवळच जात आहोत, काही वाटले तर लगेच फोन करा. १० मिनिटात पोचू आम्ही" असे सांगायला त्या खोलीत आता कोणी नसते !!

कितीतरी आठवणी..

एखादी क्वचित कधीतरी लागणारी वस्तू बरोबर जागी सापडली कि तुमची आठवण होते. "वस्तूला जागा आणि जागेला वस्तू" हे सतत लहानपणापासून कानावर पडलेले. परवा एका औषधावरचे बारीक प्रिंट वाचायचे होते. जराही विचार न करायला लागत मी तो ड्रॉवर उघडला आणि तुमचे भिंग तिथे होते. व्यवस्थित बॉक्स मध्ये घालून ठेवलेले. नकळत तुम्ही डोळ्यासमोर तरळून गेलात.

परवा "आपला मानूस" बघताना वारंवार तुमची आठवण येत होती. दु:खाने नाही तर समाधानाने. आपल्यात कितीही वाद झाले तरी शेवटी आपण त्यावर तोडगा शोधायचो - कधी ताई/माई/गीताईची मदत घेऊन तर कधी आपला आपणच. हक्काने मला तुम्ही तुमची कामे सांगायचात आणि कौतुक पण करायचात. तुम्ही गेल्यानंतर खोली आवरताना काय सापडले असेल तर माझे visiting card - तुम्ही कौतुकाने मागून घेतले होते. असेच माझे आणि मेघनाचे पर्सिस्टन्ट चे आणि माझे IMR चे पण कार्ड तुम्ही कुठेतरी नीट ठेवलेले असणार आहे. सापडेल कधीतरी.

दर महिन्याचा हिशोब लिहिताना आपली लहानपणाची हिशोबाची वही आठवते. जमाखर्च कधी जुळला नाही तरी तो लिहून ठेवायचात तुम्ही. ती सवय मी सहजरित्या उचलली. मग बंगलोर ला एकटा राहत असताना खर्चाची कधी चिंता वाटली नाही. कारण किती कमावतो आहोत आणि किती खर्च करू शकतो याचे गणित व्यवस्थित बसले तो जमाखर्च लिहायच्या सवयीमुळे. आत्तासुद्धा कुठलीही परस्थिती असली तरी मला पक्के माहित असते आर्थिक गणित कसे आहे माझे ते. मनातल्या मनात तुम्हाला नमस्कार केल्याशिवाय राहत नाही मी.

या वर्षी गणपतीला तुम्ही नव्हतात. आरत्या नेहेमीपेक्षा जास्त वेळा चुकल्या पण दुरुस्त करायला तुम्ही नव्हतात. खूप वेळा तुमच्या नेहेमीच्या जागेकडे वळून बघायचा मोह झाला पण धीर झाला नाही, कारण माहित होते, तुम्ही तिथे नाही आहात.

दादा, आई मला फारशी आठवत नाही. खूप वर्षे झाली तिला जाऊन. पण तुमचा सहवास आत्तापर्यंत लाभला ह्याचे मला खूप समाधान वाटते. आजही कधी कधी वाटते मी तुम्हाला अजून एक सहा महिने या करोना पासून वाचवायला पाहिजे होते, कदाचित आज लसवंत होवून तुम्ही उकडीच्या मोदकांचा आनंद घेतला असतात. पण ते होणे नव्हते. "ईश्वरेच्छा बलियसी" हे तुमचे शेवटचे शब्द आठवतो आणि स्वतःला सावरून घेतो. 


आठवणी येणे थांबणार नाही. त्यातच तुमचे यश आहे. सुरुवातीला खूप रडायला यायचे. पण आता खरे सांगायचे तर तुमची आठवण झाली कि छान वाटते. क्वचित डोळ्यात पाणी येते, पण बऱ्याचदा आनंदच होतो. 

एकच मागणे आहे दादा - देहरूपी नसलात तरी स्मृतीरूपी तुम्ही मला आजूबाजूला सापडत रहा.

तुमचा,

मंदार

Saturday, August 28, 2021

आपला मानूस - चित्रपट समीक्षा

काल बऱ्याच दिवसांनी मराठी चित्रपट बघण्याचा योग आला - आपला मानूस. कथा जरा रंजक वाटली म्हणून बघायचा ठरवला. कलाकार पण तगडे होते - नाना पाटेकर, सुमित राघवन आणि इरावती हर्षे. थोडी कौटुंबिक पण थरारक.



एका पावसाळी रात्री अचानकपणे आबा (नाना पाटेकर) गॅलरीतून खाली पडतात आणि कथेला सुरुवात होते. इ. नागरगोजे (परत नाना पाटेकर) या प्रकरणाचा तपास करायला येतात तसतसे राहुल (आबांचा मुलगा), भक्ती (आबांची सून) आणि आबा यांच्यातील नात्याचा गुंता हळहळू समोर यायला लागतो. 

इन्स्पेक्टर नागरगोजेंच्या तपासात हळूहळू राहुल आणि भक्ती अडकायला लागतात. नक्की काय झाले याचा अंदाज लावता लावता प्रेक्षक कथानकात गुंतून जातो. दर १०-१५ मिनिटांनी नवीन नवीन तपशील समोर येतो आणि चक्रवायला होते. नेहेमीप्रमाणे शेवटच्या १० मिनिटांत नक्की काय झाले याचा उलगडा होतो.

सुरुवात चांगली, मध्य बरा आणि शेवट बकवास - असे या चित्रपटाचे वर्णन करावे लागेल.

कथा तशी सुमारच आहे. त्यातल्या त्यात कलाकार चांगले असल्याने चित्रपट सुसह्य झाला आहे. कथालेखकाचा पक्षपाती दृष्टीकोण बऱ्याच ठिकाणी दुखावून जातो - विशेषतः स्त्रिया आणि IT फील्ड. IT मधले दाम्पत्य आपल्या मुलांची काळजी घेवू शकत नाहीत पण त्याच वेळेस crime branch मधला इन्स्पेक्टर रोज संध्याकाळी आरामात घरी शांतपणे बसलेला असतो - IT मधल्या दाम्पत्याच्या मुलीला खेळवत.

नाना पाटेकर यांनी रंगवलेला इ. नागरगोजे बराचसा चांगला जमून आला आहे. परंतु त्यांनीच रंगवलेले आबा हे पात्र मात्र अतिशय सुमार झाले आहे. मुळात त्या पात्राला फारशी खोली दाखवलेली नाही. पहिल्या १० मिनिटांमध्येच ते पात्र स्वतःबद्दल तिरस्कार करून घेते. त्यात नानांनी तो अभिनय बराचसा विक्रम गोखले यांच्यासारखा करायचा प्रयत्न केला आहे. का ते माहीत नाही. पण ते काही फारसे जमलेले नाही.

राहुल हा एक प्रथितयश वकील दाखवला आहे, तरीपण आबांना तो पैशाची बचत करत नाही याची चिंता लागलेली असते. सून काम करते म्हणजे घराकडे दुर्लक्ष करते असे पक्के ठरवून घेतलेले. 

राहुल स्वतः वकील असूनही आबांपुढे एकदम मुका. एकदाही तो आबांना भक्तीची बाजू घेऊन बोलताना दिसत नाही. त्यातल्या त्यात भक्तीचे पात्र जरा ठीकठाक आहे. 

एकंदरीत कथानकाचे बारा वाजलेले आहेत.

तेव्हा - हा चित्रपट बघितला नाहीत तरी चालेल असा आहे.

आता काही स्वानुभवातून:

  • IT field मध्ये खूप कष्ट करायला लागतात. बरीचशी दांपत्ये याची जाणीव ठेवून आपापले कार्यक्रम, meetings वगैरे ठरवतात. फक्त मुलांचीच नाही तर आई-वडील आणि सासू-सासरे इ. सर्वांची काळजी घेऊन manage करतात. कुठेतरी कधीतरी काहीतरी चुकते, पण म्हणून त्यांना "write-off" करणे चुकीचे आहे.
  • सगळेच बाबा (आबांच्या पिढीतले) आपल्या मुलाला आणि सुनेला असे वागवत नाहीत. बरेचसे समजून घेणारे असतात. आत्ताच्या जमान्यात नोकरी करणारी सून हि काही नाविन्याची गोष्ट राहिलेली नाही. त्यामुळे आबांचा एकांगीपणा न समजण्यासारखा आहे. 
तुम्ही बघितला असेल हा चित्रपट तर तुमची काय प्रतिक्रिया आहे ते ऐकायला/वाचायला नक्की आवडेल 

Sunday, October 11, 2020

हे जीवन सुंदर आहे!

 काल रात्री एक इंग्रजी चित्रपट बघत होतो - "The Intern". एक सेवानिवृत्त व्यक्ती (बेन)  एका e-commerce संस्थेत शिकाऊ उमेदवार म्हणून कामास सुरुवात करते. कथा खूप सुंदर आहे. त्याच्या सुरुवातीस त्याचे मनोगत चालू असते. पत्नीच्या मृत्यूनंतर एकाकी झालेल्या बेनचे आयुष्य बदलून जाते. वयोमानानुसार बरेचसे समवयस्क मित्र, नातेवाईक एक एक करून निघून जायला लागतात आणि त्याचा प्रभाव जिवंत व्यक्तींवर होत असतो.

ते बघता बघता मला दादांची आठवण झाली. पंच्याऐशी वर्षे अत्यंत सुंदरपणे आयुष्य जगले. एकवीस वर्षांपूर्वी आई गेली. तेव्हापासून आत्तापर्यंत त्यांनी बरेच काही बघितले, बरेच काही पचवले आणि बरेच काही शिकले पण. गेल्या काही वर्षात त्यांचे बरेचसे मित्र एक-एक करून सोडून गेले. पण दादांनी कधी कच नाही खाल्ली. 

विनायक नवाथे - दादांचे अत्यंत जिवलग मित्र. दोघांचे ऑफिस एकच. रहायचे जवळच. त्यामुळे रोजचे जाणे येणे. सकाळची दुसरी कॉफी एकमेकांच्या घरी. पुढे काका त्यांच्या दुसऱ्या घरी राहायला गेले त्यामुळे भेटी कमी झाल्या, पण फोन चालू असायचे. त्यानंतर २०१६ मध्ये दादांना COPD आहे असे निदान झाले. त्यामुळे ते घरातच स्थानबद्ध. जरा कठीणच होते ते दादांना. सतत काहीतरी करत राहायची सवय असलेल्या माणसाला एका जागी जखडून ठेवले कि कसे होईल.. तशीच काहीशी त्यांची अवस्था झाली होती. ज्यावेळेस डॉ. नी त्यांना सांगितले कि आता दिवसातला बराच वेळ Oxygen लावून ठेवायला लागेल तेव्हा ते बरेचसे हलले होते. पण त्यांची जिद्द जिवंत होती. सुरुवातीच्या त्रासानंतर त्यांनी बदललेली परिस्थिती स्वीकारली. स्वतःचा एक दिनक्रम आखून घेतला होता. त्यात TV बरोबरच देवाची पूजा आणि मित्र/नातेवाईकांना फोन हे पण होते. 



त्या दिवशी कामाचा दिवस होता, मी ऑफिस मध्ये होतो. अचानक नवाथे काकांच्या मुलाचा फोन आला. काळजात जरा शंका आली आणि दुर्दैवाने ती खरी पण झाली.. नवाथे काका वारले होते. तसे अचानकच. फोन ठेवला. आणि मला आभाळ कोसळल्यासारखे झाले. नवाथेकाका गेले .. आता हे दादांना कसे सांगू? त्यांना हा धक्का सहन होईल का? नुकतेच ते जरा स्थिरस्थावर होत होते. जरासा धक्का सुद्धा त्यांना सहन होईल असे मला वाटलेच नाही. चक्क रडायला लागलो मी .. ऑफिसमध्ये.. सहकाऱ्यांच्या मदतीने कसाबसा सांभाळून मी घरी यायला निघालो. डोक्यात काहूर माजले होते. ताई, माई गीताई सगळ्यांशी बोललो.. कसे सांगू दादांना. सांगणे तर आवश्यक होते. डॉक्टरांशी पण बोललो.. जर काही झाले तर काय करायचे वगैरे.

मला असे वाटते कि माई/किंवा गीताईला मी बोलावून घेतले होते. संध्याकाळी दादांची कॉफी झाल्यावर हिय्या करून सांगितले. धक्का बसला दादांना.. पण सावरले हळूहळू .. म्हणाले - ठीक आहे.. कधीतरी होणारच आहे.. ॐ शांति।

त्यानंतर असे बरेच प्रसंग आले. प्रत्येकवेळी मला टेन्शन यायचे. परंतु दादांनी सगळे धक्के पचवले. या सगळ्यात त्यांना त्यांच्या दिनक्रमाने खूप आधार दिला असे मला वाटते. नकारात्मक विचारांना थारा देणे त्यांना मान्यच नव्हते जणू. उरलेले आयुष्य मस्तपणे जगायचे, खाणे, TV बघणे, नातवंडे, पंतवंडे सगळ्यांचे कौतुक करणे या सगळ्यात त्यांनी स्वतःला रमवून घेतले होते.

गेल्या ४ वर्षात अनेक वाईट बातम्या ऐकूनही प्रत्येक वेळेस ते सावरायचे आणि सकारात्मकतेने परत दिनक्रम चालू ठेवायचे.

हे जीवन सुंदर आहे.. दादा ते चांगलेच जाणून होते आणि स्वतः जगत होते आणि त्यांचा हा दृष्टिकोन आम्हाला आयुष्यभर प्रेरणा देत राहील.                          

Saturday, September 26, 2020

ते सात दिवस

दादा गेले. पंधरा दिवस झाले त्याला आता.

जसे डॉक्टरांनी दादांची COVID-19 ची तपासणी करायचा सल्ला दिला, मी आणि मेघना जरा धास्तावलोच होतो. दादांची सगळी परिस्थिती बघता जर टेस्ट पॉझिटिव्ह आली असती तर बऱ्याच गोष्टी अवघड होत्या. मी ताबडतोब माझ्या तिन्ही बहिणींना सांगितले. आम्ही सगळे आशा करत होतो कि  तसे काही नाही होणार. दादांना तापाव्यतिरिक्त काहीही लक्षणे नसल्याने डॉक्टरांना पण साध्या तापाचीच शक्यता वाटत होती. सकाळी ११ च्या सुमारास तपासणी साठी सॅम्पल घेऊन गेले. संध्याकाळी साधारण १० च्या सुमारास result येईल असे सांगितले होते. जीव खालीवर होत होता. शेवटी १०:२० ला डॉक्टरांचा message आला कि पॉझिटिव्ह आहे म्हणून. त्यांनी लगेचच सांगितले कि दादांना हॉस्पिटल मध्ये दाखल करावे लागेल ते सुद्धा ICU + Oxygen + ventilator ची सोया असेल असे.

पुण्यातील परिस्थिती खूपच वाईट होती (किंबहुना अजूनही आहे). त्यामुळे काळजीत अजूनच भर पडली. परंतु आम्ही ताबडतोब हालचाल करायला सुरुवात केली. बहिणींबरोबर zoom कॉल करून सगळ्यांना कल्पना दिली आणि सगळे हात कामाला लागले - हात म्हणण्यापेक्षा मोबाईल !! जेवढे हॉस्पिटलचे क्रमांक मिळतील तिकडे फोन करून चौकशी सुरु झाली. फक्त नकारघंटाच ऐकू येत होती. काहींनी दुसऱ्या दिवशी चौकशी करायला सांगितले. आंतरजालावर असलेली माहिती अद्ययावत नव्हती. त्यामुळे अजूनच अडचण येत होती.

आम्ही सगळे मोठे लोक आमच्या परीने प्रयत्न करत असताना लहानांनी हार मानलेली नव्हती. मृण्मय आणि माझ्या भाचे कंपनीने एक google sheet तयार करून सगळा data नोंदवायला सुरुवात केली - हॉस्पिटल ची नावे, तिथले क्रमांक, ICU ची उपलब्धता इ. प्रत्येकाने आपले व्यावसायिक network मध्ये पण तपासायला सुरुवात झाली. रात्री १२:३० च्या सुमारास एक गोष्ट नक्की झाली - कि आता जे काही व्हायचे ते सकाळीच होईल.

देव कृपेने दादांना बाकी काही त्रास होत नव्हता. घरात oxygen cylinder होता त्यामुळे थोडी काळजी कमी होती.

आठ तारखेला सकाळी परत सुरुवात केली. आता आम्ही जरा जास्त संघटितपणे कामास सुरुवात केली. प्रत्येकाला हॉस्पिटल्स वाटून दिली आणि सगळीकडे पाठपुरावा चालू केला. माझ्या एका डॉक्टर मित्राने रुबी हॉल मध्ये प्रयत्न करतो सांगितले, गीताई च्या मैत्रिणीने कोथरूड मधील देवयानी हॉस्पिटलची माहिती दिली. मेघनाच्या नेटवर्क मधून संचेती हॉस्पटिल आले. सह्याद्री हॉस्पिटल पण आमच्या उपलब्ध लिस्टवर आले. रुबी हॉल मिळाला असता तर खूप चांगले झाले असते. माझा मित्रच तिथे होता आणि त्याला दादांची मेडिकल हिस्टरी माहित होती. पण दुर्दैवाने तसे होणे नव्हते.

गीताई आणि तिच्या मैत्रिणीबरोबर बोलून मी देवयानी हॉस्पिटल बद्दल माहिती घेतली. सगळे चांगले वाटले आणि सगळ्यांनी मिळून दादांना तिथे दाखल करायचा निर्णय घेतला. शेवटी दुपारी ३:३० च्या सुमारास दादांची ऍडमिशन झाली आणि उपचारांना सुरुवात झाली.

अचानक संध्याकाळी हॉस्पिटल मधून फोन - दादांना remidesivir द्यायचे आहे. असे कळले कि त्या औषधाच्या कमी उपलब्धतेमुळे रुग्णाच्या नातेवाईकांनी ते देणे आवश्यक आहे ते सुद्धा आधार कार्ड ची कॉपी देऊन!! ताबडतोब मेघनाच्या बहिणीला पाठवले. योगायोगाने ते औषध हॉस्पिटलच्या दुकानातच उपलब्ध होते आणि पुढची पळापळ वाचली.

कोणालाच भेटायला जायची परवानगी नसल्याने आम्ही डॉक्टरांच्या कॉलची चातकासारखी वाट बघायचो. पहिले दोन्ही-तिन्ही दिवस दादांची तब्ब्येत व्यवस्थित होती. आम्हा सगळ्यांचे रोज झूम कॉल्स सुरु होते. अजून काही करता येईल का याची चाचपणी चालू असायची. फारसे काही करणे शक्य नव्हते. तरी पण एक दिवस गीताई आणि माझा भाऊ मनोज दोघेही हॉस्पिटलला गेले आणि तिथल्या मुख्य डॉक्टरांशी बोलले. रेसिडेंट डॉक्टरच्या परवानगीने दादांशी एक व्हिडिओ कॉल पण केला. तोच दादांचा बाहेरच्या जगाशी शेवटचा संपर्क ठरला.   

शनिवार सकाळचा डॉक्टरांचा रिपोर्ट फारसा उत्साहवर्धक नव्हता आणि दुपारी अचानक परिस्थिती खालावल्याचा डॉक्टरांचा फोन आला. काळजात चर्र झाले. ताबडतोब झूम वरून गीताई आणि मनोजने तिकडे जाण्याचे ठरले. परंतु ते तिकडे पोहोचायच्या आधीच सगळे संपलेले होते!

सगळ्यांवर आभाळच कोसळले. तुम्ही कितीही मनाची तयारी केलेली असली तरी अशा वेळी तुम्हाला कळते कि कितीही तयारी केली तरी ती कमीच असते. त्यात भर म्हणून कि काय आम्हाला भयाण वास्तवाची जाणीव झाली. COVID रुग्ण असल्याने त्यांना घरी आणता येणार नव्हते कि त्यांचे अंत्यविधी करता येणार होते. एवढेच काय त्यांचे अंत्यदर्शन पण दुरूनच!! अत्यंत असहाय परिस्थिती होती ती. पण दैवापुढे कोणाचे काही चालते का?

सगळे करून कसाबसा घरी परतलो.

आज १५ दिवस झाले त्या सगळ्याला. दादा नसण्याची हळू हळू सवय होत आहे. कितीही वाटले तरी आयुष्य थांबत नाही. आणि दादांनाही तसे आवडणार नाही. त्यांनी स्वतः असाच धक्का पचवला होता - २१ वर्षांपूर्वी. आणि त्यानंतरही त्यांनी निराश न होता आयुष्य छानपणे जगायला सुरुवात केली होती. त्यांची त्यांच्या मुला-लेकरांकडूनही हीच अपेक्षा असणार.. नाही का?

Monday, September 21, 2020

दादा गेले...

दादा गेले ! 

पंच्याऐंशी वर्ष पूर्ण करण्यास अवघे काही दिवस असतानाच त्यांना अचानक बोलावणे आले. आणि कुठलाही मोह न ठेवता त्यांनी पुढच्या प्रवासाला सुरुवात केली.

गेले चार एक वर्षे दादांची झुंज चालू होती. COPD (chronic obstructive pulmonary disease) ने त्यांना ग्रासले होते. जवळजवळ पूर्ण वेळ त्यांना प्राणवायू चे उपकरण लावून ठेवावे लागायचे. तसा त्रासच तो. सतत नाकात नळी. साधे उठून बाथरूम ला जायचे म्हटले तरी लक्षात ठेवून ती नळी काढायची आणि परत आल्यावर आठवणीने लावायची. मधून मधून pulse oxymeter वर saturation बघून नोंद करून ठेवायची. 

सगळे त्यांनी शांतपणे सहन केले. कुठे कधी तक्रारीचा सूर नाही कि गाऱ्हाणे नाही.  त्यांनी स्वतःचा दिनक्रम  ठरवून घेतलेला होता आणि त्याबरहुकुम त्यांचे सगळे चालायचे. त्यात बदल करायचा हक्क फक्त त्यांचा (आणि बहुतेक माईचा - बऱ्याच वेळा मी तिच्याकडून त्यांना निरोप द्यायचो 😜) त्यांच्या सिरीयल च्या वेळेप्रमाणे त्यांची कामे चालायची. इतके कि त्यांनी मोबाईलवर गाजर लावून ठेवलेला असायचा कि चॅनेल कधी बदलायचा ते. सिरिअलच्या कथेत इतके ते गुंतून जायचे कि काही काही वेळा मी जाऊन चेक करायचो कि हे कोणाशी एवढे बोलत आहेत!! देवांची पूजा असो कि सकाळचे प्रातर्विधी, व्यायाम म्हणून फेऱ्या असोत कि दुपारची सक्तीची झोप, सगळ्याचा दिनक्रम व्यवस्थित आखून घेतलेला होता. 

या सगळ्यामध्ये त्यांनी नवीन तंत्रज्ञान पण आत्मसात केले होते. मोबाईल वर  WhatsApp, फेसबुक सगळं वापरायचे. कित्येकांशी त्यांनी WA च्या माध्यमातून दररोजचा संबंध ठेवलेला होता. COPD मुळे घरात बंदिस्त झाल्यामुळे मोबाईल हि त्यांची जगाशी संपर्क ठेवण्याची गुरुकिल्ली होती आणि त्यांनी ती लीलया आत्मसात केली होती. त्यांच्या कित्येक परिचितांच्या दिवसाची सुरुवात आणि शेवट दादांच्या "सुप्रभात" आणि "शुभ रजनी" या संदेशाने होत असे. जर कधी कोणी reply नाही केला तर दोनेक दिवसात दादांचा त्यांना फोन जायचा चेक करायला कि सगळे ठीक आहे ना म्हणून. सगळ्यांना प्रेमाने बांधून ठेवले होते त्यांनी..

गेले आता... साडेचार वर्षे झुंजून, आणि तसे झुंजताना पण जगायचं कसं हे शिकवून पुढच्या प्रवासाला गेले. दुर्दैव एवढेच कि मुले, जावई, सून, नातवंडं, पंतवंडं, आते/मामे भावंडं, बहिणी एवढा मोठा परिवार असूनही शेवटच्या क्षणी आम्हापैकी कोणीच त्यांच्याजवळ नव्हतो. सर्वांना धरून राहणारे दादा शेवटच्या क्षणी मात्र एकटेच होते. नियती अजब असते म्हणतात ती अशी. 

परंतु एक समाधान नक्की आहे - सर्व प्रकारचे आघात पचवूनही दादा शेवटी सुखी आणि समाधानी होते.