Saturday, August 28, 2021

आपला मानूस - चित्रपट समीक्षा

काल बऱ्याच दिवसांनी मराठी चित्रपट बघण्याचा योग आला - आपला मानूस. कथा जरा रंजक वाटली म्हणून बघायचा ठरवला. कलाकार पण तगडे होते - नाना पाटेकर, सुमित राघवन आणि इरावती हर्षे. थोडी कौटुंबिक पण थरारक.



एका पावसाळी रात्री अचानकपणे आबा (नाना पाटेकर) गॅलरीतून खाली पडतात आणि कथेला सुरुवात होते. इ. नागरगोजे (परत नाना पाटेकर) या प्रकरणाचा तपास करायला येतात तसतसे राहुल (आबांचा मुलगा), भक्ती (आबांची सून) आणि आबा यांच्यातील नात्याचा गुंता हळहळू समोर यायला लागतो. 

इन्स्पेक्टर नागरगोजेंच्या तपासात हळूहळू राहुल आणि भक्ती अडकायला लागतात. नक्की काय झाले याचा अंदाज लावता लावता प्रेक्षक कथानकात गुंतून जातो. दर १०-१५ मिनिटांनी नवीन नवीन तपशील समोर येतो आणि चक्रवायला होते. नेहेमीप्रमाणे शेवटच्या १० मिनिटांत नक्की काय झाले याचा उलगडा होतो.

सुरुवात चांगली, मध्य बरा आणि शेवट बकवास - असे या चित्रपटाचे वर्णन करावे लागेल.

कथा तशी सुमारच आहे. त्यातल्या त्यात कलाकार चांगले असल्याने चित्रपट सुसह्य झाला आहे. कथालेखकाचा पक्षपाती दृष्टीकोण बऱ्याच ठिकाणी दुखावून जातो - विशेषतः स्त्रिया आणि IT फील्ड. IT मधले दाम्पत्य आपल्या मुलांची काळजी घेवू शकत नाहीत पण त्याच वेळेस crime branch मधला इन्स्पेक्टर रोज संध्याकाळी आरामात घरी शांतपणे बसलेला असतो - IT मधल्या दाम्पत्याच्या मुलीला खेळवत.

नाना पाटेकर यांनी रंगवलेला इ. नागरगोजे बराचसा चांगला जमून आला आहे. परंतु त्यांनीच रंगवलेले आबा हे पात्र मात्र अतिशय सुमार झाले आहे. मुळात त्या पात्राला फारशी खोली दाखवलेली नाही. पहिल्या १० मिनिटांमध्येच ते पात्र स्वतःबद्दल तिरस्कार करून घेते. त्यात नानांनी तो अभिनय बराचसा विक्रम गोखले यांच्यासारखा करायचा प्रयत्न केला आहे. का ते माहीत नाही. पण ते काही फारसे जमलेले नाही.

राहुल हा एक प्रथितयश वकील दाखवला आहे, तरीपण आबांना तो पैशाची बचत करत नाही याची चिंता लागलेली असते. सून काम करते म्हणजे घराकडे दुर्लक्ष करते असे पक्के ठरवून घेतलेले. 

राहुल स्वतः वकील असूनही आबांपुढे एकदम मुका. एकदाही तो आबांना भक्तीची बाजू घेऊन बोलताना दिसत नाही. त्यातल्या त्यात भक्तीचे पात्र जरा ठीकठाक आहे. 

एकंदरीत कथानकाचे बारा वाजलेले आहेत.

तेव्हा - हा चित्रपट बघितला नाहीत तरी चालेल असा आहे.

आता काही स्वानुभवातून:

  • IT field मध्ये खूप कष्ट करायला लागतात. बरीचशी दांपत्ये याची जाणीव ठेवून आपापले कार्यक्रम, meetings वगैरे ठरवतात. फक्त मुलांचीच नाही तर आई-वडील आणि सासू-सासरे इ. सर्वांची काळजी घेऊन manage करतात. कुठेतरी कधीतरी काहीतरी चुकते, पण म्हणून त्यांना "write-off" करणे चुकीचे आहे.
  • सगळेच बाबा (आबांच्या पिढीतले) आपल्या मुलाला आणि सुनेला असे वागवत नाहीत. बरेचसे समजून घेणारे असतात. आत्ताच्या जमान्यात नोकरी करणारी सून हि काही नाविन्याची गोष्ट राहिलेली नाही. त्यामुळे आबांचा एकांगीपणा न समजण्यासारखा आहे. 
तुम्ही बघितला असेल हा चित्रपट तर तुमची काय प्रतिक्रिया आहे ते ऐकायला/वाचायला नक्की आवडेल 

No comments: